बदल दळणवळणातील
*बदल दळणवळनातील*
2 दिवस झाले गावात एकच गलबालाट चालू होता इंग्रजांशी लढणारा मोठा नेता मरण पावला होता. हळहळ व्यक्त करून आता गावातील माणसे पावसाळा संपल्यावर करावी लागणाऱ्या कामाच्या तयारीत जुंपली होती. पावसाळा संपून गेला होता. आता रस्त्यावरच चिखल सुकला होता पण काही ठिकाणी गाडी रवली तर काढायला पार आणि कासरे याची जुळवाजुळव चालू होती. बैलांचा खुराक, जेवणाची भांडी, धान्ये, भात, चटणी, ताट हे सर्व तरुण पोरांना लावलेली काम होत. जाणती माणस, बैलगाड्यांची चाक, जोखड, वंगणं, कासरे, चरहाट नेणाऱ्या बैलांच्या तब्येती, इतर गावातील जाणारी माणसाची माहिती, दरवर्षी धान्य आणतो त्यांची विचारपूस करून निघायचा दिवस ठरवत होते. रस्त्यात दरोडेखोरांचा काही उपद्रव, इंग्रजांचा काही त्रास होतोय का याची जमेल अशी माहिती गोळा करून ठेवली होती. डोंगराळ भागात भात आणि फक्त खरीप पिके येत होती. पण कधी कधी दुष्काळ, ओला दुष्काळ पडला की ही पिके पण येत नसत. कुडाळ भागातून लोणंद-निरेच्या सपाट भागात जाऊन लागणारे धान्य बैलगाड्यात भरून आणणे हे 1920 च्या आधी पासून ते अगदी 1950 पर्यंत कधी कधी वर्षा आड करावे लागायचे काम होते. घर सोडले की जायला 1 ते 2 दिवस 1 दिवस मुक्काम आणि परत येताना धान्याने भरलेल्या बैलगाड्या खंबाटकी घाटातून चढवून उतरवणे हे अवघड आणि जोखमीचे काम होते. त्यात कधी कधी एखादा व्यक्ती जखमी होत असे, बैलांना इजा होत असे. परंतु गावा गावातील मोठे समहू एकत्रपणे या मोहीमा पार पाडत असत.
आज दळणवळण, वाहतूक इतकी सोपी झाली आहे की आपले पूर्वज किती कष्ट करून पुढे आले आहेत हे ऐकून आणि वाचून मन भरून येते.
मागील महिन्यात लोणंद भागात फिरायला गेलो असताना वडिलांकडून ह्या जून्या आठवणीला उजाळा मिळाला. हे लिहून उतरवले पाहिजे हा विचार करून हा छोटासा लेख लिहिला आहे.
लेखक जयंत जगताप
7738022343
Comments
Post a Comment