माझं जीवन
तुकाराम आणि सरसाबाई जगताप यांना एकूण सहा अपत्य. 3 मुले आणि 3 मुली. भिकू, सावित्री, विनायक, जिजाबाई, पार्वतीबाई आणि शेवटचे पांडुरंग.
3 भावांना एकूण मिळून 10 अपत्य. 6 मुले आणि 4 मुली.
मोठे चुलते भिकू जगताप(अण्णा) यांना 3 मुली (मंगल, अनिता, रसिका) आणि 1 मुलगा (अजय). मधले चुलते विनायक (भाऊ) यांना 3 मुले( अतुल, निलेश आणि मानसिंग),.आणि सगळ्यात लहान माझे वडील पांडुरंग (बापू) यांना 1 मुलगी(सुनीता) आणि 2 मुले (जयंत आणि विजय).
वयोमानानुसार दहा जणांमध्ये माझा नंबर 7 वा. आणि फक्त 6 मुलांमध्ये माझा नंबर 3 रा लागतो.
1955 पासून ते 1993 पर्यंत एकूण 20 जणांचे एकत्रित कुटुंब महू गावातील जगताप वाड्यात नांदत होते. वडीलधारे सांगतात की 1978 साली घरात बांधलेला पाळणा 1989 पर्यंत तसाच होता. 10 जण त्याच पाळण्यात झुलून झोपून मोठे झाले आहेत. माझा जन्म 1985 च्या मार्च महिन्यातील शनिवारी 2 तारखेला झाला. आई सांगते माझी पाचवी होळीच्या दिवशी झाली होती. त्याचे परिणाम काय झाले ते पुढें वाचनात येईलच.
त्याकाळी मुलगा होणे म्हणजे खूप आनंदची गोष्ट समजली जायची (आजही परिस्थिती फार वेगळी नाही आहे). माझा जन्म बघायला माझे आजोबा ह्या जगात नव्हते, पण वडिलांकडून त्यांच्या गोष्टी ऐकून ऐकून एक प्रतिमा नेहमी डोळयांसमोर उभी राहायची त्यामुळे मीही त्यांचा सहवास उपभोगलाय अशी जाणीव होते. जन्माला आलो तेव्हा अतिशय किरकोळ आणि वजनाला कमी होतो. काया अगदी काळसर होती तेव्हा माझी आज्जी म्हणायची माझा पांडुरंगाला कृष्ण झाला आहे. पुढे या कृष्णा ने खूप लीला करून सर्वांना हैराण करून सोडले होते.
एकत्रित कुटुंब, त्यात बागायती शेती, घरात बैलजोडी, म्हशी, गाय, कोंबड्या, घरामागे अंगणात खळे, पाच खनाचे, मातीच्या 3 फूट रुंदीच्या भिंती, रस्त्यावर लागून घर, घरात यायला मधोमध दरवाजा, आत आले के डाव्या बाजूला म्हशींचा गोठा, आणि उजव्या बाजूला स्त्रियांची मोरी आणि त्याबाजूला कोंबड्यांचा खुरडा. (बाकी जनावरांचा वेगळा गोठा गावातील वाड्यात होता.) गोठा पासून 2 फूट उंच लागून ओटी. ओटीवर लाकडी माळा, ओटी नंतर मधल घर आणि त्यामागे स्वयंपाकघर किंवा पडवी म्हणतात तो भाग. पडवीत जेवणाची चूल आणि भांड्यांची मांडणी. पडवीतून मागे अंगणात जायला दरवाजा मग तिथे डाव्या बाजूला पुरुषाना अंघोळ करायची चिप( मोठा सपाट दगड) त्यावर कपडे धुतली जात आणि आम्हाला पण. आणि त्याबाजूला पाणी तापवयाची चूळ. आंघोळीचे पाणी पुढे जाऊन अंगणात वळवले होते तिथे पपई चे झाडे होती.
Comments
Post a Comment