पव..त..
*पव.. त*
पव.. त शब्द असा वाचा व.. थोडा वढुन आणि त लगेच सोडा. पवत अस नाही. पूर्ण महाराष्ट्र मध्ये ही प्रथा आहे की नाही माहीत नाही पण पश्चिम महाराष्ट्रात आहे. नागपंचमीच्या दिवशी सफेद दोरा घेऊन त्याला हळद लावून पिवळे केले जाते. मग आपले आई तो दोरा हातात बांधते. आणि तसाच एक दोरा मुलींच्या गळ्यात बांधला जातो. याच्या मागे काय शास्त्र आहे माहीत नाही पण आई ज्या प्रेमाने बांधते त्यामुळे तो दोरा नंतर आठवड्यात पुन्हा सफेद झाला तरी तसाच हातात राहतो. ह्या दोऱ्याला पव..त म्हणतात. ह्या पवत्याची मग सवय होऊन जाते. कधी कधी एकांतात दुसऱ्या हाताच्या बोट यात गुंडाळून पव..त तोडायचा प्रयत्न केला जातो पण तुटत नाही.
नागपंचमी दिवशी बांधलेले पवत, सरत्या सोमवारी (म्हणजेच श्रावणातील शेवटचा सोमवार) काढून नदीत सोडतात. वडील याची आठवण सांगत होते की खास पवत सोडण्यासाठी ते आमच्या महू गावातून राजपुरीच्या डोंगर चढून पलीकडे वाईला उतरत असत आणि कृष्णामाई मधे पावत विसर्जित करून येत असत. सोबत बाजार म्हणून येताना मोठी केळी आणि मक्याची कणसे घेऊन येत असत.
काहीजण ही पवत गणेश विसर्जन दिवशी सुद्धा सोडतात आणि विसर्जित करतात.
अस हे पव..त. आजच्या काळात ही प्रथा बंद पडत चालली आहे. यात कोणता अर्थ असेल कोणाला माहीत नाही आणि आधुनिक पिढी याला महत्त्व देत नाही आहे.
आई ने पोराला दिलेलं हे पव.. त म्हणजे मानसिक संरक्षण असते अस मला वाटत.
धन्यवाद
जयंत जगताप
Comments
Post a Comment