माझा पहिला प्रवास
*माझा पहिला लांबचा प्रवास आणि दुंदिबाबा*
गोष्ट 1991 ची आहे तेव्हा मी ६ वर्षाचा होतो.
लहानपणी मी खूप मस्ती करायचो. तुम्ही म्हणाल मस्ती तर सर्वच करतात लहानपणी. त्यात काय नवीन? माझी मस्तीची एक वेगळी उंची होती. आम्ही मुंबईला राहायला गेल्यावर 10 वर्षांनी सुद्धा गावात मस्ती करणाऱ्या जी मुलांची तुलना माझ्याशी होत असे. वयस्कर माणसं म्हणायची जयासारखी (माझं गावच नाव जया) करतोय मस्ती पण त्याच्या इतकी नाही. जे मला विनाकारण चिडवत असत अशा अनेकांची दगड मारून डोकी फोडली आहेत. त्यामुळे माझं नाव दगडीच्या अस पडलं होत. उगाच मला भांडणात ओढत त्यांना मी सोडत नसे. घरात आईचा मला रोज मार बसायचा. असच एकदा वटपौर्णिमा होती, आई मला सोबत घेऊन बनातील मंदिरात गेली होती. तिथं मोठ वडाचं झाड होत आता त्यातील अर्धच राहिले आहे, तर त्या वडाच्या पारंब्या खूप लांब होत्या. उंचावरून खाली आल्या होत्या. बायका वाद पुजत होत्या तेव्हा मी त्या पारंब्या ना लोंबकळत होतो. कोणालाच माहित नव्हत वर आगीमहू आहे. ते कसं उठल माहीत नाही. माश्या बायकांवर घोंगावू लागल्या, एकच गोंधळ उडाला. सर्व जणी घराकडे पळू लागल्या आणि सोबत अफवा उडाली जय ने वाटपौर्णिमेला महू उठवले. नशिबाने कोणाला माश्या चावल्या नाहीत पण मला आईचा बेदम मार बसला. अशा अनेक न समजणाऱ्या कारणाने मला मार बसायचा मग बाहेर कोणी खोडी काढली की माझा राग त्यावर निघायचा. ताकदीने मोठा असेल तर दगड मला साथ द्यायचे आणि झाडावर दगड मारून मारून नेम पक्का झाला होता. एक दोन दगडात मी काम फत्ते करायचो, मग समोरचा घरी येऊन खोटं काहीतरी सांगून मला फटके बसतील याची व्यवस्था करायचा. फक्त म्हाताऱ्याआई (आज्जी) माझा लाड करायची. तिला समजत होते हे मी बळहून करत नाहीये. यावर उपाय म्हणून तिने एक महाराजांकडे मला घेऊन जायचं ठरवलं होतं. फरसुंदीला दुंदिबाबाचा आश्रम आहे, ते आयुर्वेदिक औषध आणि अंगारा देतात. त्यासाठी तिने बापूना (वडील) गावी बोलावले होते.थंडीचे दिवस असतील. संध्याकाळी सहा साडेसहा वाजता आम्ही शेवटच्या ST ने कुडळला पोहचलो. तिथे गणपती मंदिरासमोर एक मोठा हॉल मध्ये बसून राहिलो. तिथेच आणलेला डब्बा खाल्ला. बापू मध्ये मध्ये बाहेर जात व काहीतरी चौकशी करून येत. मी आणि म्हाताऱ्याआई खूप वेळ तिथेच बसून होतो. हॉल चा दरवाजा मोठा होता, त्यावर एक पडदा लावलेला होतो. वडील बाहेर गेले की मी टक लाऊन त्या पडद्या कडे बघत बसायचो. कधी बापू येतायत आणि आम्ही निघतोय अस झाल होत..
रात्री किती वाजले होते माहीत नाही पण एक matador गाडी आली. अशी एकादी छोटी गाडी मी पहिल्यांदाच बघत होती. आम्ही सगळे त्यात बसलो, अजूनही काही माणसं होती. आम्ही मागे उभ्या शिट वर बसलो होतो. गाडी सुरू झाली, मी कसतरी बंद असलेल्या काचा मधून बाहेर बघायचा प्रयत्न करत होतो. फक्त अंधार आणि त्यात चंद्रप्रकाशात दिसणारी झाड होती. किती वेळ बघितलं माहीत नाही, जेव्हा जागा झाला तेव्हा फरसुंदी आश्रमात बापू अंघोळ घालायला उठवत होते. तिथे एक हौद होता तिथे गार पाण्याने अंघोळ घातली आणि मग बाबाच्या दर्शनाला घेऊन गेले. धुंदीबाबा नी डोक्यावर हात ठेवला, डोक्याला अंगारा लावला, बापूनी माझं डोकं टेकवून मला आशीर्वाद घेऊन दिला. तिथे घेतलेला दुंदीबाबाचा फोटो आजही आमच्या गावच्या देव्हाऱ्यात पुजला जातो. मग परत नाष्टा करून आम्ही त्याच गाडीने फरसुंदी ते कुडाळ परत निघालो. आता जास्त काही आठवत नाही पण एक छोटा घाट लागला होता आणि झाडे-झाडे आणि शेत दिसत होती..
असा हा माझा आठवणीतील पहिला प्रवास होता.
तुमचाही आठवणीतील पहिला प्रवास कळवा..
धन्यवाद
लेखक जयंत जगताप
Comments
Post a Comment